मावळमित्र न्यूज विशेष:
२९,  सप्टेंबर हा दिवस” जागतिक हृदय दिन”
आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात.
भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, गरजेचे आहे तसेच हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडली गेली पाहीजे.
  इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.
  हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.
मुंबईकरांनी हद्यविकारा पासुन दुर रहावे म्हणुन वरील प्रकारचा संदेश “ मुंबई डबेवाला असोशिएशन” देत आहे. हा संदेश मुंबई शहरा पुरता मर्यादित न राहता जगभरात पोहचावा असे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले.
तळेकर म्हणाले,”
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

error: Content is protected !!